भूलथापा नको, काम दाखवा.

भूलथापा नको, काम दाखवा.

विशाल विधाते यांचे भाजपच्या माजी नगरसेवकांना जोरदार प्रतिउत्तर

बाणेर बालेवाडी सूस म्हाळुंगेमधील रहिवाशी हा भोळाभाबडा, अजाण आहे असा गैरसमज विद्यमान नगरसेवकांचा झाला आहे. पण गेल्या पाच वर्षातील इथली बदली परस्थिती विद्यमान नगरसेवकांना ठाऊक नाही. इथल्या रहिवाशींना ख-याची आणि खोट्याची चांगली समज आहे. जनतेच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेऊन पाण्याला निवडणुकीचा मुद्दा बनवून गाजर दाखवलेल्या विद्यमान नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात काडीमात्र काम केलेलं नाही. आता पुन्हा निवडून येण्यासाठी तोच पाण्याच्या मुद्दा उकरून काढत विद्यमान नगरसेवक रहिवाशांना खोटी आशा दाखवत प्रचार करू लागले असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्र. ९ चे अध्यक्ष विशाल बाबुराव विधाते यांनी व्यक्त केले. 

सत्ता असो वा नसो पहिल्यापासून बाणेर बालेवाडी सूस म्हाळुंगेच्या समस्या सोडवण्यासठी मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे हे कटिबध्द राहिलेले आहेत. कारण इथल्या जनतेसोबत असणारं नातं हे विद्यमान नगरसेवकांसारखं केवळ निवडणुकीपुरतंच मर्यादीत नसून मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या कुटुंबासारखंच नातं आहे. बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी या परिसरात ४ साठवण टाक्या बांधण्यात आल्या होत्या. यांसदर्भात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी २ ऑक्टोबर २०२२ रोजी या टाक्यांमध्ये पूर्ण क्षमेतेने पाणी सोडण्यास वारजे केंद्रातून स्वतंत्र पाईप लाईन टाकावी अशी मागणी केली होती. आता ती पूर्णत्वास देखील येत आहे. परंतु मोठ्या कष्टाने शासनदरबारी पाठपुरावा करून मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी बाणेर बालेवाडीतल्या रहिवाशांच्या घरात पाणी आणलं, पण याचं श्रेय आयत्या बिळावर नागोबा बनत विद्यमान नगरसेवक घेत आहेत.

राष्ट्रवादीच्या काळात २०१६ साली ही योजना अजितदादांच्या हस्ते उदघाटन करून करण्यात आली होती. 'समान किमान पाणीपुरवठा योजना' असं या योजनेचं जुनं नाव होतं आणि नवीन योजनेचं नाव २४/7 पाणीपुरवठा असून ही योजना बाणेर बालेवाडीवासीयांना मिळावी यासाठी मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनीच अतोनात प्रयत्न केले. विद्यमान नगरसेवक मात्र मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या कष्टाला पाठीमागे लोटण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या मतदारांनी विद्यमान नगरसेवकांना निवडून दिलं त्याच मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न विद्यमान नगरसेवकांनी केला आहे. विद्यमान नगरसेवक हे २०१८ साली सूस खिंडीपासून ते बालेवाडीपर्यंत पाण्याची लाईन मंजूर करण्यात आल्याचा दावा करत असतील तर इतक्या दिवसांपासून काम का रखडले ? आणि या दाव्यातही पाणीपुरवठ्याविषयीचे विद्यमान नगरसेवकांचे अज्ञान दिसून येते. परंतु बाणेर बालेवाडीमधील वाढती गृहसंकुलं लक्षात घेऊन पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊनच मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी पाणीपुरवठ्याबाबत सर्वांगीण विचार केला आणि त्याच प्रयत्नातून चांदेरे यांनी वारजेपासून ते बालेवाडीपर्यंत पाणीपुरवठ्याची लाईन करून घेतली. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत रहिवाशांना देखील आता मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. पाणी समस्येचे आगामी काळातील गांभीर्य लक्षात घेऊन मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी महापालिकेच्या अधिका-यांबरोबर पाहणी दौरा केला होता. तेव्हा त्यांच्या  लक्षात आलं की, सूसवरून पाण्याची लाईन ३० इंची जाणार आहे. त्यामुळे पाण्याचं एक्स्टेंशन करण्यासाठी वारजेवरून एक्स्टेशन करण्यात आलं. पाषाण आणि बाणेरच्या टेकडीवरून मिळणारं पाणी बाणेर बालेवाडीला मिळणार नाही याचा अभ्यास मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे यांना होता आणि त्या दृष्टीकोनातून अधिका-यांशी त्यांनी चर्चा करून थेट वारजेवरून पाईपलाईन बाणेर बालेवाडीवासियांसाठी करून आणली.

सूस खिंडी ते बालेवाडीपर्यंतच्या पाण्याची लाईनचे काम पूर्ण न केलेल्या आणि कामातही गौडबंगाल केलेल्या विद्यमानांनी आतातरी खरे वागावे, कारण तुमचं सगळं पितळ उघडं पडलं आहे. ज्या कामासाठी आयुक्त कार्यालयात खोटी कागदपत्रं सादर केली तीच कागदपत्र बाणेर बालेवाडीवासीयांना दाखवून विद्यमानांतर्फे दिशाभूल करण्यात आली. आपल्या अकार्यक्षमपणाची भिती आता वाटू लागल्यानेच विद्यमान श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु श्रेयवादाचा उतावीळपणा न करता विकासाच्या कामात राजकारण न आणता, बाणेर बालेवाडी वासीयांच्या समस्या कशा सुटतील यासाठी विद्यमानांनी एकत्र येणं गरजेचं आहे, मात्र तसे होत नाही हे मात्र दुर्दैव. पाण्यावर राजकारण करण्यापेक्षा त्यावर मार्ग कसा निघेल याचा विचार श्रेय लाटणा-यांनी करायला हवा. खोटे दावे-प्रतिदावे करत बसण्याऐवजी विद्यमानांनी पाणी प्रश्नावर अधिक गंभीर होण्याची गरज आहे. विद्यमान नगरसेवक २०१६ साली सुध्दा लोकांना अशीच पाण्याची खोटी स्वप्न दाखवून निवडून आले आताही तोच प्रयत्न होत आहे. आता पुन्हा जनतेला पाण्यासाठी वेठीस धरून त्यांची मतं मागायला जातायेत. परंतु पाच वर्षात केवळ विकासाचं गाजर दाखवलेल्या विद्यमानांच्या ढोंगी जनसेवेला बाणेर बालेवाडीचा सुजाण रहिवाशी मुळीच भुलणार नाही. बाणेर बालेवाडीची जनता अहोरात्र जनसेवेसाठी कटिबध्द आणि पाणी समस्या सोडवण्यासाठी कायम आग्रही असलेल्या ख-या लोकसेवकाच्या अर्थात मा. बाबुराव चांदेरे यांच्याच पाठीशीच कायम आहे.