Sharad Pawar : शरद पवारांचा फोन, फुटीर खासदारांबाबत काय प्लॅन ठरला? ठाकरेंच्या बैठकीआधी राऊतांनी सगळं सांगितलं

Sharad Pawar : शरद पवारांचा फोन, फुटीर खासदारांबाबत काय प्लॅन ठरला? ठाकरेंच्या बैठकीआधी राऊतांनी सगळं सांगितलं

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील फुटीचा दुसरा अंक पाहायला मिळत असून पक्षाचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार फुटणार, हे स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर फुटीर खासदारांना कायदेशीर पेचात अडकवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज आपल्या संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठीचा व्हिपही पक्षाचे लोकसभेतील नेते अरविंद सावंत यांनी जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत खासदारांना कारवाईचा इशारा दिला आहे. " शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संसदीय नेते अरविंद सावंत यांनी पक्षाच्या लोकसभा खासदारांची ११ वाजता बैठक बोलावली आहे. यासाठीचा व्हिप जारी करण्यात आला असून संबंधित खासदारांना ईमेल, व्हॉट्सअॅप आणि प्रत्यक्ष संवाद साधून हा व्हिप पोहोचवण्यात आला आहे. जे खासदार आजच्या बैठकीला हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट करत बंड करणाऱ्या खासदारांविरोधात आम्ही महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या मदतीने आक्रमक भूमिका घेणार असल्याचं सांगितलं आहे. मला याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचाही फोन आल्याचं राऊत म्हणाले. बंडखोर खासदारांना इशारा देताना संजय राऊतांनी म्हटलं आहे की, "आमची आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आणि शरद पवार यांचाही आम्हाला फोन आला होता. आमचं असं म्हणणं आहे की, आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असेल तर त्यांना सोडायचं नाही. त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन राडे करायचे. पवारसाहेब स्वत: म्हणाले की, मी त्या भागांमध्ये जाऊन जाहीर सभा घेईन. कोणत्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सोबत आहे," अशी माहिती राऊत यांनी दिली.


राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "देशाच्या राजकारणाचा गोलपीठा झालाय आणि त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आमदार-खासदार एखाद्या पक्षातून निवडून येतात आणि पैशांचं आमिष दाखवताच पक्षांतर करतात. ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत असेल तर महाराष्ट्राच्या परंपरेचा गोलपीठा झाला आणि ते करण्यात भाजपचं योगदान आहे," असं राऊत यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांचे ‘वेट अँड वॉच’

पक्षातील फुटीची कुणकुण लागलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ जून रोजी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली होती. तरीही पक्षातील फूट रोखण्यात त्यांना अपयश आले. फुटीर खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पक्षाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत हे मंगळवारी रात्रीच दिल्लीत दाखल झाले. या तिघांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. परंतु, उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवसभरात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. सगळ्या घडामोडी स्पष्ट होईपर्यंत ते ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत असल्याचे सांगण्यात येते